वाचक लिहितात   

संकटकाळात आपण सर्व एक... 

व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान येथील काही दहशतवादी तळांवर हल्ले करून भारताने पहलगाम हल्ल्याचा ’ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतल्यानंतर समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा महापूर आला. चित्रपटसृष्टी, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातूनही समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या. ऑपरेशन सिंदूरने साहजिकच वृत्तपत्रांची पानेच्या पाने भरून गेली. वृत्तवाहिन्यांवर अँकरसहित वृत्तवाहिन्यांचे संपादक, राजकीय विश्लेषक, माजी लष्करी अधिकारी, पक्ष प्रवक्ते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक असे सर्वच जण आपापल्या परीने ऑपरेशन सिंदूरचे विश्लेषण करत होते. विशेष म्हणजे अनेक वृत्तवाहिन्यांवर दिवसभर या मोहिमेत कोणते ड्रोन, बॉम्ब, क्षेपणास्त्रे वापरली गेली त्याच्या इत्यंभूत तांत्रिक तपशिलाचा उहापोह केला जात होता. एकूणच या प्रतिक्रियांमधून भारतीय सैन्याचे कौतुक ओसंडत वाहत होते आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाल्याची भावना होती. देशातील मतांतरे असलेल्या विविध राजकीय पक्षांनी भारतीय सैन्याचे या कारवाईबद्दल एक सुरात गुणगान गायले आणि संकटकाळात आम्ही सर्व एक आहोत याचे दर्शन जगाला घडवले.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   

पाकिस्तान धार्जिणे देश

केसरी दि.३ मे मधील पाकिस्तानला ५७ मुस्लिम देशांचा पाठिंबा ही बातमी वाचून ’मांजराला उंदिर साक्ष’ ही उक्ती आठवली. मुळात पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊ पाहणारे बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वा या भागांतील स्थानिक नागरिकच पाकिस्तानला त्रासदायक ठरत आहेत. त्यातच बिलावल भुट्टो, तसेच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीही १९८०-९०च्या दशकापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी निरपराध्यांच्या जीवघेण्या कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देऊन पोसल्याचे कबूल करतात. जर इस्लाम विनाकारण हिंसेच्या विरोधात असेल, तर इस्लामिक सहकार्य संघटनेचे सदस्य असलेल्या देशांनी, भारताच्या पहलगाममध्ये धर्मांधतेने निष्पाप नागरिकांच्या नृशंस हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा, तेही आशियाच्या शांततेबाबत पाकिस्तानने मुद्दा उपस्थित केला म्हणून हे हास्यास्पद आणि घृणास्पद आहे. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करून वाळीत टाकण्याचा प्रस्ताव भारताने ठेवला तर त्यावर एकमत व्हायला हवे. त्याऐवजी सापाप्रमाणे उलटू शकणार्‍या पाकिस्तानला पाठिंबा देणार्‍या देशांची कीव करावीशी वाटते.

श्रीपाद कुलकर्णी, पुणे

दहशतवाद पूर्णत: ठेचा

भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पाडली. या बाबतीत असे जाणवते की, सध्या आपला देश बाहेरच्या व अंतर्गत सुरक्षेबद्दल किती दक्ष राहिले पाहिजे. दहशतवाद्यांना व नक्षली कारवाई पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय भारतीय लष्कराने आता उसंत घेऊ नाहीच, एवढे मात्र निश्चितच आहे. पहलगाम दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याशिवाय ही मोहीम पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. आपले भारतीय सशस्त्र सेना किती कुशल व सक्षम आहे त्याचा प्रत्यय आपण घेत आहोत.

नीलम सांगलीकर, पुणे.

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

२६ निष्पाप पर्यटकांचे त्यांच्या कुटुंबा देखत बळी घेणार्‍या पाकिस्तानआश्रित दहशतवादाला भारताने मंगळवारी ’ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर देऊन मोहीम तर फत्ते केलीच, शिवाय समस्त भारतीयांच्या मनात दाटलेल्या दुःख आणि संतापाच्या भावनांना जणू वाटच मोकळी करून दिली. किंबहुना त्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात खदखदत असलेली बदल्याच्या आगीची धग काहीशी शांत झाली! हा दिवस आपल्या पराक्रमी सैन्य दलासाठी निश्चितच ’नमनदिन’च होय. तथापि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळेच किंवा ढिसाळपणामुळेच दहशतवाद्यांनी तब्बल दोनशे तीनशे किलोमीटर आत येऊन पहलगाममध्ये २६ निरापराध पर्यटकांचा बळी घेतला, याचे सरकारने विस्मरण होऊ देऊ नये.

श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)

महामार्गांवर सुविधांअभावी प्रवाशांची कुचंबना! 

देशात मोठमोठे महामार्ग बांधण्याची घाई करीत महामार्गांचे काम पूर्ण करण्याच्या नादात, त्या महामार्गांचा प्रवासी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना त्यांचा फायदा होतो का? याचा विचार देखील केला जात नाही. बांधकामांची सुरुवात आणि त्यांचे भपकेबाज सोहळे साजरे केले जातात; परंतु अशाच मार्गांवर अपघातात सापडलेल्यांना गोल्डन आवरमध्ये कॅशलेस वैद्यकीय सेवा देण्यात अजूनही दिरंगाई केली जाते. कॅशलेस वैद्यकीय सेवा करण्याची तरतूद लागू झाल्यापासून तीन वर्षे झाली; परंतु ती प्रत्यक्षात अंमलात आणणे केंद्राला जमले नाही. सरकारच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. सर्वत्र महामार्ग बांधून त्याचे श्रेय घेण्यास राज्यातील राजकारणी पुढे सरसावत असतात; परंतु महामार्गावरून प्रवास करताना महामार्गांलगत प्रवाशांच्या सोयींसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, अपघात प्रसंगी प्रथमोपचारांची सोय केली आहे का नाही याचा तपास केलाच जात नाही. प्रवाशांना होणार्‍या या गैरसोयींची प्रत्येक गावांतून, शहरांतून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी निदान आपल्या विभागातून जाणार्‍या मार्गांवर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला काय हरकत आहे?

स्नेहा राज, गोरेगांव.

 

Related Articles